Tuesday, 28 December 2021

अधिकारी..

व्यक्तीचं खरंखुरं व्यक्तिमत्व जर समजून घ्यायचं असेल तर त्या व्यक्तीला एकदा अधिकारी करा असं म्हटलं जातं. अधिकारी प्रवर्गाची व्यामिश्रता हा अभ्यासाचा विषय आहे. अधिकाऱ्यामधला माणूस आणि माणुसकीची मात्रा खूप मॅटर करत असते. 

द्रष्टे नेते यशवंतराव चव्हाण म्हणत असत की रुक्ष कागदांच्या फाईलमध्ये एक मानवी चेहरा असतो, त्या चेहऱ्यावरील भावना वाचता आल्या पाहिजेत. लोककल्याणाची जबाबदारी व्यवस्थेने आपल्यावर सोपवलेली आहे याचे भान त्या अधिकाऱ्याला असले पाहिजे. गांधीजींच्या मते शेवटच्या देहाती सामान्य माणसापर्यंत तुम्ही राबवलेल्या धोरणाचे फायदे पोहोचत असतील तर ते धोरण चांगले.. तुमचे हेतू शुद्ध असावेत आणि हेतू साध्यतेचे मार्गही तितकेच शुद्ध असावेत.

हे नोकरशहा जेव्हा बाबू बनतात तिथे आपली व्यवस्था हारते. बंडलबाज अधिकाऱ्यांच्या घरी-दारी, नातेवाईकांकडे नोटांचे बंडल मिळतात तेव्हा संवैधानिक व्यवस्थेनं अधिकार बहाल केलेल्या या विश्वस्थांवरचा विश्वास उडू लागतो. अधिकारपदामुळे काहींचा पाठीचा कणा एकदम ताठ होतो आणि त्या फॉल्स इमेजमुळे ही अधिकारी मंडळी माणसातून उठून जातात. आपण जणू एलियन्स आहोत असा भास या मंडळींना होतो. खुर्चीवरील पांढऱ्या टर्किश टॉवेलची परीटघडी या वेगळेपणाची नव्हे तर एकाकी आणि एकारलेपणाची साक्ष देतात. सहीचे अधिकार संपल्यावर म्हणजे निवृत्त झाल्यावर ही माणसं खूपच एकलकोंडी बनतात. मी नेमका कोण? असला स्वतःच्या अस्तित्वाचाच मूलभूत प्रश्न त्यांना सतावतो.

नेत्याला जशी कार्यकर्त्यांच्या गर्दीची नशा असते त्याप्रमाणे अधिकाऱ्यांना सुद्धा या स्वार्थी स्तुतिपाठकांमध्ये रमायला आवडतं. सोय आणि स्वार्थ संपला कि ही भाटांची गर्दी ओसरते तोवर आपला बर्‍यापैकी वापर करून घेतला गेलाय याचे भान अधिकाऱ्याला येते. पदाला, पोझिशनला रिस्पेक्ट देणाऱ्या ह्या मंडळींना त्या अधिकाऱ्यामधील व्यक्तित्वाशी काही देणेघेणे नसते. खरंतर व्यक्ती म्हणून, माणूस म्हणून आणि त्यांच्या शुद्ध हेतूबाबत अधिकारी वर्गाचा आदर केला जावा.. धोरणकर्ते ते लाभार्थी अशा धोरण अंमलबजावणीतील अधिकारी हा प्रमुख दुवा असतो, सेतू असतो..

मोजकेच अधिकारी मात्र लोकसेवकाच्या भूमिकेत जमिनीवर राहून लवचिक धोरण स्वीकारत माणसात राहतात आणि गर्दीत उठून दिसतात. 

पद, खुर्ची आणि अधिकार हे सर्वसामान्य लोकांसाठी असतात. लोकांनाही याचे भान नसते. ते अधिकाऱ्यांना साहेब साहेब म्हणून हिणवत असतात. साहेब म्हणून संबोधनं खरंतर गुलामीचे लक्षण आहे, त्याऐवजी सर हे संबोधन अधिक आदराचं. आपण 1947 सालीच साहेबांना हाकलून लावलेलं आहे. पण आपल्या नेणिवेत जे काही भाऊसाहेब आणि रावसाहेब बसलेले आहेत त्याचे काय? त्यासाठी नागरिकत्व, एकत्व, भारतीयत्व अशा संवैधानिक तरतुदींचा अभ्यास करावा लागेल. अधिकारांचा आग्रह धरताना जबाबदाऱ्यांचेही भान ठेवावे लागेल. क्लिष्ट जीआरमधे लोककल्याणकारी कृतिकार्यक्रमांद्वारे प्राण फुंकण्यासाठी अधिकारी मात्र तितका जिंदादिल असावा. असा खूप सारा प्रवास होणे बाकी आहे.

 - मारूती शेरकर

No comments: