Friday, 11 November 2016

लेकुराचे हित..

"लेकुराचे हित
जाणे माउलीचे चित्त
ऐसि कळवळ्याची जाती
करी लाभाविण प्रीती"

तुकोबांचे अभंग हे आपले सांगाती आहेत. मला काही सांगायची उबळ आली की, मला पामराला तुकोबांची मदत घ्यावी लागते. आज मी पालकांशी थोडंस हितगुज करणार आहे. सुरुवात अर्थात माझ्या घरापासून.

इयत्ता आठवीत शिकणारा माझा मुलगा निलय आणि मित्राचा मुलगा सुजय या दोघांनीही क्रिकेटच्या वेडापायी हट्टाने आमच्या पनवेल येथील कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडेमीत क्रिकेट क्लब जॉईन केला. छान चालल होत. अर्थात त्यांना नेण-आणणं हा मोठाच व्याप करावा लागत होता. एके संध्याकाळी तो म्हटला की, पप्पा उद्यापासून क्रिकेट खेळायला येण बंद. मी कारण विचारले तर तो म्हणाला की आज माझ्या हातून कॅच सुटला आणि एका मुलाने आईवरून शिवी दिली. आता क्रिकेट बंद म्हणजे बंद. मी त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला खरा पण व्यर्थ. कारण त्याला म्हणून हसडलेली आणि त्याने ऐकलेली, त्याला ऐकून समजलेली ती पहिलीच शिवी. काही केल्या त्यातून तो बाहेर येईना. त्याच्या आत्मसन्मानाला ठेच लागली होती. त्याच्या मनोविश्वातलं हे जग नव्हत. बर, शिवी देणारा मुलगा विसरला होता की तो कुणाला नि काय बोलला. त्याच्यासाठी ती एक स्वाभाविक प्रतिक्रिया होती. त्यात त्याला काही विशेष वाटलं नव्हत. त्याच्यासाठी असं बोलण ‘used to’ असंच होत.

शिवी हा अभिव्यक्तीचा एक प्रकार आहे हे आम्ही पालक त्याच्या निरागस मनावर बिंबविण्यात अयशस्वी ठरलो होतो. कोणत्या गोष्टी लाईटली घ्यायच्या अन कोणत्या सिरीअसली हे त्याला सांगण्यात आम्ही कमी पडलो होतो. केवळ आदर्शाच्या गप्पा अथवा संस्कार करून माझा मुलगा त्याच्या रोजच्या लढाईत यशस्वी होणार नाही अशी माझी मनोमन खात्री झाली.

असाच एक दुसरा प्रसंग माझ्या शाळेतला. शाळेतली ही ‘माझी मुलं’, घरच्या माझ्या मुलांपेक्षा अधिक भाग्यवान आहेत. कारण त्यांना माझा सहवास-मार्गदर्शन जरा आधिकचं मिळत. मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिकणारी मुलं अतिशय गरीब घरांतून येत असतात. त्यांच्या कथा आणि व्यथांवर नंतर बोलूया. कारण त्यांची कुटुंब आणि सामाजिक व्यवस्थेची वीण खूपच विस्कटलेली आहे. असो. ह्या मुलांना शिकविण्यापेक्षा त्यांचं या दिवसाचं पालकत्व निभावताना आम्हा शिक्षकांची दमछाक होते. दहावीच्या वर्गात शिकत असलेली माझी विद्यार्थिनी अगदीच नाराज वाटली. कारण विचारले तर तणतणत म्हणाली की, आई माझ्यावर चिडते आणि बाबापण मला मारतात. दोन दिवसांपासून मी त्यांच्याशी बोलतसुद्धा नाही. शाळा हे मुलांसाठी दुसरे घर, आणि त्या शाळेतील शिक्षक हे त्या मुलांचे दुसरे आणि तितकेच मायाळू आईवडील असले पाहिजे हा विचार मी गेली पंचवीस वर्षे प्रत्यक्षात जगत आलो आहे. मी त्या मुलीला समजावले. इथपासून सांगितले की, तुझ्या आईवडिलांचे रोजचं जगण कसं महायुद्ध आहे. हातावरचं पोट त्यांचं, त्यांनी घरी येताना हसत यावं, तुझ्या लहानसहान चुका पोटात घालून तुला माफ करावं ही अपेक्षाच तू कशी करू शकते. मी तिला म्हटल, तू वडिलांच्या पाया पड, आणि तुझ्या निरक्षर आईच्या थेट कुशीत जा. सॉरी म्हण. बघू काय होत ते. दुसऱ्या दिवशी ह्या मुलीची कळी खुलली होती. काही दिवसांनी तिच्या वडिलांनी माझ्याकडे तक्रार केली की, माझी मुलगी रात्री बेरात्री उठून अभ्यासाला बसते. तिला समजवा.

अलीकडे आईबाबा दोघांनाही खर्चाच्या तोंडमिळवणीसाठी घराबाहेर पडावं लागतं. चांगल्या पगारदार मुलांच्या समस्या आणखी वेगळ्या आहेत. मात्र गरिबाघरची परवड खूप जवळून पाहिल्याने मन अगदी गलबलून येत बघा. घरी दारी ताणतणाव वाढले आहेत. घरातलं टेंशन कामाच्या ठिकाणी आणि कामाचा ताण / शीण घरी घेऊन येण्यान समस्यांत भरच पडली आहे. कॉर्पोरेट जगात stress management चे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते. अगदी पोलिसांना ही अधूनमधून योगाचं प्रशिक्षण दिल जात. काही अर्धशिक्षित पालक पेपरबिपर वाचतात. काहीजण ठार विसरूनच गेले आहेत की आपल्याला लिहिता वाचता येतंय म्हणून. वाचनाची आवड नाही त्यामुळे विचार करण्याचीही सोय नाही. लिहिण्याचा संबंध केवळ सही करण्यापुरताच. घरी आल्यावर ह्या पालकांनाही विरंगुळ्याची आवश्यकता असते. मात्र घरातल्या टीव्हीचा, बाहेरच्या डीजेचा आवाज त्याला अधिकच अस्वस्थ करून सोडतो.

गरीबीचे बाय प्रॉडक्टही खूप असतात बघा. राहायला १०x१० चे घर नसते. झोपड्यांमध्ये बाहेरची हवा यायला खिडक्याही क्वचितच असतात. कुठल्या तनामनाच्या आरोग्याची अपेक्षा करणार? बाहेर कुठेतरी सत्यनारायण, वाढदिवस रोजचाच. प्रचंड अज्ञान नि अंधश्रद्धा त्यांच्या पाचवीला पुजलेल्या असतात. अशा अवस्थेत मुलांचे संगोपन हा अतिशय क्लिष्ट प्रश्न बनतो. आहार आणि विहार दोन्ही बाबतीत ही मुल कुपोषित असतात. किती बाप हसत हसत आपल्या चिमुरड्याला कुशीत घेतात? किती बाळ आपल्या आईच्या मांडीवर डोकं ठेऊन चूक कबूल करून हमसून हमसून रडून मोकळ होतात. मोकळ होण्याच्या जागा झपाट्याने कमी होत आहेत. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीत कधी आईच्या, कधी आजीच्या पदराआड लपता येत होते. काका-मावशी, मामा-मामींकडे काही काळ राहायला मिळत असे. गोड धोड खायला मिळायचं, थोडं कवतिक झालं की मुठभर मांस वाढायचं. गाव, तिथली माती-माणसं एकप्रकारे संस्कारशाळा असायची.

ह्यातून सावरायचं कसं?  

तर घरातला टीव्ही आणि सामोपचाराने का होईना आजूबाजूचा कोलाहल विशेष प्रयत्नाने कमी केलाच पाहिजे. घरी-दारी कर्णकर्कश आवाजाने आपली ऐकून घेण्याची क्षमताच संपून जाते आणि अलीकडे उपदेश चालतात कोणाला?

तर एकमेकांच्या भावविश्वात डोकावता आले पाहिजे. आधी स्वतःच्या आत डोकावता येण आवश्यक आहे. आपला आतला आवाज इतका क्षीण झाला आहे की तो आपल्या मेंदूपर्यंत पोहोचतच नाही. शांत निवांतपणा हरवलाय. संवाद आणि सुसंवाद वेगाने कमी होतोय. संध्याकाळचं जेवण सर्वांनी एकत्र घेतलंय, गप्पांचा छान फड रंगलाय, अभ्यासाव्यतिरिक्त एखाद्या कलेच्या प्रांतात मुशाफिरी केलीय, हरवून गेलोय आपण त्यात, हा असा ‘ट्रान्स मूड’ फार दुर्मिळ झालेला आहे. अभ्याससुद्धा हसत खेळत करायचा असतो, स्वतःला विसरून अभ्यासातही तासन् तास आपली तंद्री लागू शकते हे अगदीच विरळा.

गुण आणि सद्गुण ह्यापासून मुलं झपाट्याने पारखी होताना मनाला खूप क्लेष होतात. परीक्षेतले मार्क्स मिळविण्यासाठी न समजताही पाठांतर करणे, शाळेनंतर/आधी क्लासेस, (अगदी रोबो करून टाकलंय त्यांना आपण) उठता बसता घरी-दारी सूचना, सक्ती, तुलना यातून ही मुलं खचून जातात. त्यांची निकोप वाढ होत नाही. त्यांच्यातले सुप्त गुण, कला आतल्याआत घुसमटून जातात. मुलांची म्हणून स्वतःची एक दुनिया आहे. त्यांच्या आनंदाच्या आणि दुखऱ्या जागा समजून घ्या. त्यांच्या समस्येची मूळे जाणून घ्या. त्यांना नवनिर्माणाचे, फुलण्याचे नवनवीन पर्याय द्यायला हवेत. थोडं त्यांच्या कलेने घ्यायला हवं. त्यांची ना स्वतःशी ओळख ना उर्वरित जगाशी. पण प्रत्येकाचा वकूब निराळा, आवडीनिवडी वेगवगळ्या. खूप संयम बाळगून त्यांना ऐकलं पाहिजे. त्यांना बोलत करा, त्यातून शिक्षक आणि पालकांना दोघांनाही खूप शिकायला मिळेल. आपलं मत त्यांच्यावर न लादता त्यांना मनमोकळेपणाने मत मांडायची संधी देण आवश्यक आहे. वयोपरत्वे त्यांच्या तनामनात क्रांतिकारी बदल होत असतात. हार्मोन्सच्या बदलामुळे त्यांचं वागण बोलण बदलत. हा बदल खर तर संधी समजून, ह्या अपरिमित उर्जेला विधायक वळण देता येण सहज शक्य आहे. त्यासाठी थोडं सजग होण आवश्यक आहे. असं म्हटलं जात की, सुसंस्कृत आईवडीलांपेक्षा अधिक चांगले शिक्षक संभवत नाहीत. “तुका म्हणे मायबापे, अवघी देवाची स्वरूपे” या उक्तीनुसार आईवडिलांचा – वडीलधाऱ्यांचा मान सन्मान राखला गेला पाहिजे. घरात भौतिक गरिबी असू देत, पण विचाराचं दारिद्र्य असता कामा नये. प्रतिकूल परिस्थिती खर तर एक मोठा प्रेरणास्त्रोत असतो.

जन्माला कोठे यावं हे आपल्या हातात नाही मात्र जरी माझे मायबाप परिस्थितीने गरीब असले तरी स्वकर्तुत्वाने ह्या गरीबीवर मात करून मी यशवंत होईन, गुणवंत होईन. ही विजीगुषी वृत्ती ह्या नवीन पिढीमध्ये निर्माण करण्यासाठी घराघरातून प्रयत्न व्हायला हवे आहेत, शाळा ह्या supportive आहेतच.        

जाता जाता संदर्भ म्हणून पुन्हा एकदा तुकोबा,

"लोहो परिसासी रुसले
सोनेपणासी मुकले,
येथे कोणाचे काय गेले
ज्याचे त्याने अनहित केले"

- मारुती शेरकर,

दि. १० नोव्हेंबर २०१६

No comments: