कोहम-सोहम
अशा अध्यात्मिक गुंत्यात अडकण्याइतकं शहाणपण माझ्याकडे नक्कीच नाही. पण ह्या ‘मी’ला गोंजारत बसल्याने अनेकदा आपल्याला निखळ आनंदाला मुकावं लागतं.
चालण्याचा व्यायाम करताना, दूरच्या प्रवासाला निघताना साधा
बर्म्युडा घालायलाही आपण आपल्या संस्कृतीला वेठीस धरतो. खरेतर आपणच आपल्याला एका
कोषात बंदिस्त केलेलं असतं. ओशो म्हणतात, “बस एक ही रोग,
क्या कहेंगे लोग?”
इतरांना
बरं वाटावं,
त्यांनी चांगलं म्हणावं म्हणून मनात आलेला बालसुलभ, नैसर्गिक उमाळा आपण दाबून टाकतो. ‘मी’ची ही प्रतिमा (false image) बनवण्यासाठी विशेष
प्रयत्न केले जातात. आधी असलं मी अमुक
तमुक आपल्या मनात निर्माण होतं .मग जवळच्या लोकांकडून ह्या प्रतिमेवर शिक्कामोर्तब
केलं जातं. भाई, दादा, अण्णा, बापू अशी कित्येक टोपणनावे हेतुपुरस्सर निर्माण केली जातात. राजकारणात तर
हे सर्रास चालू आहे, पण सर्वसामान्य सुद्धा ह्या प्रतिमेसाठी
आटापिटा करताना दिसतात. प्रतिमानिर्मिती आणि संवर्धनासाठी काही एजन्सीज काम करतात.
तर फ्लेक्स, सोशल मीडियातून कानीकपाळी ओरडून ती प्रतिमा
इतरांवर बिंबवली जाते, नव्हे तर लादली जाते.
डायरेक्टर, चेअरमन असली एखादी टर्म जरी मिळाली तरी ती बिरुदावली मेल्यानंतरही मिरवली
जाते. अगदीच काही नाही तर गेला बाजार - शेठ, पाटील म्हणवून
घेतल्यानेही लोकांना जन्माचे सार्थक झाल्यासारखे वाटते. समाजात किलो किलोने आपली
पत वाढली असा त्याला भास होत राहतो.
मानाने, सन्मानाने लोकांनी दिलेली उपाधी नक्कीच शोभून दिसते. माझ्या लहानपणी
पारनेर येथील दत्तू पाटील हे मला आजही ‘बॉर्न पाटील’ वाटतात. काय त्यांचा रुबाब, बटू मूर्ती होती पण
त्यांच्या पल्लेदार मिश्या, भरगच्च पागोटं, एका हातातला धोतराचा सोगा.., चालण्या-बोलण्यातली
पाटीलकी ही त्यांच्या नसानसातून वाहत असे. अशा गावोगावच्या पाटलांना इंग्लडच्या
राजा-राणीप्रमाणे घराघरात-मनामनात मान होता. रात्री बेरात्री अडीअडचणीला ते धावून
येत असत. एक प्रकारचं ते कोर्टच असायचं. त्यांचा शब्द अंतिम असायचा, प्रमाण असायचा. काळ बदलला, परिस्थिती बदलली पण
त्यांचे असलेले नसलेले वारस, गाववाले, भावकीवाले
आजही नावापुढे ‘पाटील’ लावतात. त्यांची
मात्र कीव करावीशी वाटते. आपण कोण? आपलं कर्तृत्व काय?
असले प्रश्न आपल्याला फिजूल वाटू लागतात.
सरकारी
कचेऱ्यांमध्ये किंवा कोणत्याही क्षेत्रातील वरिष्ठांना ‘साहेब’ संबोधलं जातं. गावात विविध कार्यकारी
सोसायटीच्या कारकुनास ‘भाऊसाहेब’ म्हटलं
जातं. हे भाऊसाहेब नंतर नंतर स्वत:च स्वतःचे नाव विसरलेले असतात. तहसीलदारांना
रावसाहेब म्हटलं जातं. खरं तर आपण १९४७ साली ह्या ‘साहेबाला’
हाकलून लावलेलं आहे. एखाद्याला साहेब संबोधून त्याचं आपण अवमूल्यन
करतो असं मला वाटतं. मी तर अनेक सन्माननीय अधिकाऱ्यांना साहेबाऐवजी ‘सर’ ह्या नावाने संबोधतो. काहींना तर मी स्पष्टीकरण
करून सांगतो की, इंग्लंडच्या राणीने त्या काळच्या कर्तबगार
लोकांना Nighthood ही उपाधी दिली होती. त्यात आपले
गुरुदेव टागोरही होते. जालियनवाला बाग हत्याकांडानंतर त्यांनी ‘सर’ ही उपाधी इंग्रजांना परत केली होती. डॉक्टर,
वकील, इंजिनिअर अथवा कोणत्याही क्षेत्रातील
तज्ज्ञ आणि वरिष्ठांना आजही ‘सर’ म्हटलं
जातं.
महात्मा
गांधी लोकांना सांगायचे की मी ‘महात्मा’ नसून
अल्पात्मा आहे. असंतोषाचे जनक असलेल्या टिळकांना लोकांनी ‘लोकमान्य’
म्हटलं, पोलादी पुरुष वल्लभभाई पटेलांना
लोकांनी ‘सरदार’ म्हटलं, महाराष्ट्राला साक्षर करणाऱ्या भाऊराव पाटलांना ‘कर्मवीर’
म्हटलं, फक्त दीड दिवस शाळेत गेलेल्या तुकाराम
साठे या वारणेच्या वाघाला, फकिराला लोकांनी ‘अण्णाभाऊ’ संबोधलं. विष्णू वामन शिरवाडकरांना अवघं साहित्यजगत ‘तात्यासाहेब’
म्हणून ओळखतं. कुष्ठरोग्यांची सेवासुश्रुषा करणाऱ्या मुरलीधर देविदास आमटेंना आपण ‘बाबा आमटे’ म्हणतो. सामान्य माणसाला अनेक अधिकार
मिळवून देणाऱ्या राळेगणसिद्धीच्या किसन बाबुराव हजारे ह्यांना आपण ‘अण्णा’ म्हणतो. अनाथांची नाथ असलेल्या सिंधुताई सपकाळ
ह्यांना आपण ‘माई’ म्हणतो. ह्या
थोरामोठ्यांनी आपल्या टोपण नावाचे branding
/ campaigning केले नव्हते. तर हे महानुभाव
त्या नावा-गावा पलीकडचे आहेत. त्यांचा त्याग, त्यांचं
उत्तुंग कार्य बघितल्यानंतर आपण नतमस्तक होतो. आपल्या उपाध्या गळून पडतात.
परवा
whats app वर प्रकाश - मंदा हे आमटे उभयता विमानतळावर एका कट्ट्यावर घरून आणलेली
चपाती-भाजी खात असतानाचे चित्र बघितले. इन्फोसिसचे सर्वेसर्वा नारायण आणि सुधा
मूर्ती असेच जमिनीवर एका कट्ट्यावर राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांची वाट पाहत
बसले होते. कलामांचा विषय निघाला म्हणून एक प्रसंग सांगण्याचा मोह आवरत नाही.

१९८०
दरम्यान आपल्या अवकाश तंत्रज्ञानाद्वारे PSLV (Polar Satelitte Launch Vehicle) द्वारे भारतीय बनावटीचा उपग्रह आपण अवकाशात सोडला होता. त्याचे शिल्पकार
डॉ. अब्दुल कलाम मुंबईच्या नेहरू तारांगण येथे व्याख्यान देत होते. तत्कालीन
पंतप्रधान श्रीमती. इंदिरा गांधी ह्यांनी आपल्या संरक्षण
सल्लागार कॅप्टन सतीश शर्मा यांना फर्मावले होते की, “Who is the man behind this achievement? I want to meet
him.”
कॅप्टन सतीश शर्मा यांनी तातडीने कलामांशी संपर्क साधला आणि
इंदिरांजींचा मेसेज त्यांना दिला. मित्रांनो कलामांनी काय म्हटलं असावं, “माननीय पंतप्रधानांना भेटण्यासाठी माझ्याकडे सूट-बूट नाहीत. ह्या असल्या
साध्या वेशात आले तर चालेल काय?” यावर कॅप्टन सतीश शर्मा
यांनी दिलेलं उत्तरही तितकंच महत्वाचं आहे. “श्री. अब्दुल
कलाम, आपण विजयाचे वस्त्रालंकार ल्यायलेले आहात, तुम्ही चिंता करू नका. आहे त्या वेशात या तुमचे स्वागत आहे.” अशी अनेक उदाहरणे आहेत.

गोलमेज
परिषदेच्या समारोपानंतर सर्व शिष्टमंडळ इग्लंडच्या पंचम जॉर्ज राजाला भेटण्यासाठी
आले. तेव्हा सर्वजण सुटाबुटात होते. अपवाद फक्त गांधीजींचा होता. बर्फाळ थंड
प्रदेशातही हा भला माणूस इग्लंडमध्ये केवळ पंचा नेसून त्या राजाला भेटला. असा राजा
की ज्याच्या साम्राज्याचा सूर्य ह्या पृथ्वीतलावर कधीही मावळत नव्हता. हे घडलं
कशामुळे?
सुटाबुटातले मोहनदास गांधी आफ्रिकेहून भारतात आले. गुरु नामदार
गोपाळकृष्ण गोखल्यांनी त्यांना भारत भ्रमण करण्यास सांगितले होते. वर्ध्यातल्या
आश्रमात त्यांच्या लक्षात आले की, लोकं सार्वजनिक ठिकाणी
यायचं टाळतात. विशेषतः महिला की ज्यांना लज्जारक्षणासाठी ल्यायला पुरेसे कपडे
नाहीत. तिथे आपण सुटबूट काय मिरवायचा? ह्या साध्या प्रश्नाने
मोहनदास गांधींना महात्मा बनवले. हे सर्व महात्मे, महामानव
यांनी आपला मार्ग प्रशस्त केलेला आहे. मार्गदर्शन आहे, मार्गक्रमण
कुठाय? हा जटील प्रश्न आहे.
तुकोबांनी
म्हटलंय,
जेथे
पाहे तेथे देखीचा पर्वत !
पायाविण
भिंत तातडीची !!
तुका
म्हणे मना पाहिजे अंकुश !
नित्य
नवा दिस जागृतीचा !!
© मारुती शेरकर