Friday, 28 December 2018

सोनू तुला शिकायचं नाय काय?


दुपारी अडीचची वेळ. इयत्ता सहावीत शिकत असलेल्या आरती या माझ्या विद्यार्थिनीच्या मागोमाग चालत मी तिच्या घरी पोहोचलो. घर कसलं? चिंध्या नी ताडपत्री वापरून केलेला तात्पुरता निवारा. बाहेर उजेड मात्र आत काळोख. मोबाईलच्या उजेडाने आत डोकावलं. साताठ वर्षांचा एक मुलगा गोवर ने सर्वांगावर फोड्या येऊन तापाने फणफणत होता. घायकुतीला आलेला, अंधारात मुटकुळी घालून पडलेला तो जीव बघून मन सुन्न झालं. तेवढ्यात त्या सहा मुलांचा बाप आपल्या दोन बायकांसह तेथे अवतरला. हे वडार समाजाचे कुटुंब कर्नाटकच्या बिदर भागातून इथे जगायला आलंय. बाळाच्या औषद पाण्याची चौकशी केली. ते म्हंटले उद्या देवीच्या नावानं लिंबाच्या पाण्यानं आंघोळ घातली की तो बरा होईल. मी तात्काळ सायन रुग्णालयातल्या ओळखीच्या डॉक्टरांना फोन करून मुलाच्या मेडिकल ट्रीटमेंटची व्यवस्था करून दिली. बाकी मुलांची चौकशी केली तेव्हा कळले की सगळीच मुले लिहिण्या-वाचण्यात अडचणी जाणवणारी. मात्र ही मुलं वरच्या वर्गात येत राहिली. खाण्यापिण्याची चौकशी करता कळले की सकाळी चहा बरोबर पाव किंवा ब्रेड खाऊन मुले शाळेत येतात. शाळेत यांना पोषण आहार मिळतो. संध्याकाळी शिळा भात वगैरे.. गरम चपाती यांना ठाऊकच नाही. आरतीचा जन्म दाखला नसल्याने शिक्षण हक्क कायद्यानुसार अंदाजे वय बघून गेल्या वर्षी तिला पाचवीत प्रवेश दिला. तसं पाहिलं तर ही अक्षरशत्रू मुलगी आहे. अबकड येत नसल्याने लिहिणं-वाचणं दूरच.

लिहिता-वाचता न येणारी मुलं वरच्या वर्गात येतातच कशी? 6 ते 14 वर्षे वयोगटातल्या मुलांचा मोफत शिक्षण हक्क कायदा आणि नो डीटेन्शन पॉलिसी. मग त्या त्या वर्गातील त्या-त्या विषयाची अध्ययन निश्चिती, क्षमता कशी तपासली जाईल? रेमेडियल टीचींग, उपचारात्मक शिक्षण, वरच्या वर्गाला जलदगती शिक्षण वगैरे. संकलित, सर्वंकष आकारिक मूल्यमापनाद्वारे चालण्या-बोलण्याला, अर्धवट वह्यांना सुद्धा गुण आहेत. हा काही त्यावरचा रामबाण उपाय नाही. ही मुलं शिक्षणाच्या मुख्य प्रवाहातच नाही. वर पासून खालपर्यंत आपली शिक्षण व्यवस्था नापास झाली की काय?

ब्लेमगेम न करता आपण आपले ऑडिट करूया, नव्हे पोस्टमार्टम करूया. शिक्षक, प्रशासन आणि पालक सर्वांनाच अंतर्मुख होण्याची वेळ आलेली आहे. केवळ समाजाला आणि पालकांना दोष देण्यात काय अर्थ? जगण्याची धडपड प्रसंगी धुणी-भांडी सफाई कामगार असे हातावरचे पोट असलेले हे तळागाळातले लोक आपले पालक आहेत. शैक्षणिक पार्श्वभूमी असलेल्यांना परवडणारे शिक्षण उपलब्ध आहे. मात्र गोरगरिबांना आपलं मूल शिकावं ही जरी इच्छा असली तरी हे शिक्षण त्यांच्या अजेंड्यावर नाही. अनेक निरोप पाठवूनही पालक शाळेत शिक्षकांना भेटायला येत नाहीत. अशा वेळी शिक्षकांनी त्या पालकांपर्यंत पोहोचले पाहिजे. शास्तीच्या धास्तीमुळे नाही किंवा कोणाची शाबासकी मिळविण्यासाठी नव्हे. कुठला पुरस्कार मिळवण्यासाठी नव्हे तर केवळ आपल्या आंतरिक समाधानासाठी आपण हे करायला हवं. मुलांच्या अनुपस्थितीची कारणे शोधली पाहिजेत. हे बाळ पोटभर जेवलं की नाही? मुलाचं वर्गात शिक्षकांकडे लक्ष का लागत नाही? शरीराने वर्गात आणि मनाने आणखी कुठेतरी भकटण्याला attention deficiency म्हणतात. आणि अभ्यास करण्याची इच्छाच नसण्याला poverty of expectation म्हणतात. आपण त्यांचे प्रेरणास्रोत आहोत. त्यांच्यात नवी स्वप्नं आपल्याला रुजवायची आहेत. प्रेमाला पारखे असलेल्या ह्या मुलांचे मायबाप आपल्याला बनता आलं पाहिजे.

हे मूल शाळेत आलं पाहिजे, ते शाळेत टिकलं पाहिजे आणि हो ते शिकलं पाहिजे यावर प्रशासन ठाम आहे. प्रत्येक मूल वेगळं आहे. शिकण्याचा त्याचा वेग वेगवेगळा आहे. वस्तुस्थिती मात्र अतिशय विदारक आहे. अजिबात लिहिता-वाचता न येणाऱ्या मुलांपैकी काहीजण गतिमंद अथवा मतिमंद असू शकतात. त्यांना लर्निंग डिसेबलचा दाखला मिळवून देण्यासाठी डॉक्टरांकडे पाठवण गरजेचं आहे. शिक्षक शिकवतात. अधिकारी शाळांना भेट देतात. ऑन पेपर सगळं आलबेल आहे. मात्र वर्गनिहाय अध्ययन क्षमता प्राप्त न केल्याने ही मुलं जगाच्या आणि जगण्याच्या मुख्य प्रवाहात येत नाहीत. त्यासाठी रिझल्ट ओरिएंटेड काम होणे आवश्यक आहे. त्यासाठी केवळ प्रत्येक मूल लिहितं-बोलतं झालं, म्हणजे आपलं काम झालं असं नव्हे. तर घराघरातून आणि शाळाशाळांमधून चांगला संस्कार त्यांच्यावर होणे आवश्यक आहे.

महानगरपालिकेच्या शाळांमध्ये मी शिकवलेली काही मुलं अमेरिकेत आहेत. 1995 सालातली सुवर्णा कुऱ्हाडे या माजी विद्यार्थिनीने तोंडी परीक्षेचे मार्क नसतानाही इंग्रजी विषयात 90 गुण मिळवले होते. तिची गुणपत्रिका मी मुद्दाम सांभाळून ठेवली आहे. सध्या ती अमेरिकेत असते. तेव्हा तर बायोमेट्रिक अटेंडन्स नव्हता. लवकर येऊन आम्ही जास्तीचा वेळ मुलांना देत होतो. मी गेल्या 27 वर्षांपासून शिक्षकी पेशात कार्यरत आहे. काळ आणि परिस्थितीसापेक्ष बदलांना तोंड देता देता पुरती दमछाक होत आहे. चिडचिड न करता बदल सहज स्वीकारले तर अर्थात हा त्रास कमी होईल. बघूया काय ते..


- मारुती शेरकर (28/12/2018)

No comments: