Monday, 2 January 2017

सॉरी सावित्रीमाई..

सॉरी सावित्रीमाई..
      
      ३ जानेवारी सावित्रीमाईचा जन्मदिवस. वर्षातला आपला पहिला सण आणि म्हणूनच वर्षातील पहिलं नमन या माऊलीला. यानिमित्तानं तिच्याशी बोलून मोकळं व्हावं म्हणतो. 

तुझी वाट तुडवताना, तुला केवळ सॉरी म्हणणं आमच्या हातात आहे. मळलेली वाट न मळवता, चूल आणि मुल ह्या परंपरेचे पाईक न बनता तू आमच्या उद्धारासाठी शिक्षणाद्वारे प्रशस्त मार्ग निर्माण केला. पण आमच्याने मार्गक्रमण होऊ शकले नाही. म्हणून सॉरी..

आज एकवेळ स्त्री चंद्रावर, मंगळावर पोहोचू शकेल मात्र काही ठराविक मंदिरात किंवा दर्ग्यात ती जाऊ शकत नाही. माणुस म्हणून तिची वाटचाल जर तू दाखवून दिलेल्या मार्गावरून झाली असती, तर नक्कीच असल्या कोणत्याही अमानवी भेदभावाला तिला सामोरे जावे लागले नसते. खरंच सावित्री, तुझी वाट तुडवली असती तर ही शोकांतिका नक्कीच टळली असती. कैक वर्षापूर्वी तू वादळात दिवा लावला. तू घराच्या उंबरठ्याबाहेर पडलीस. नवऱ्याला तोलामोलाची साथ दिलीस. १७५ वर्षापूर्वी तू १ जानेवारी १८४८ ला जोतिबांच्या सहाय्याने भारतातील पहिली मुलींची शाळा सुरु केली. जोतिबाचं मानवी हक्कांचं स्वप्न साकारण्यासाठी तू स्त्रीमुक्तीचं कार्य हाती घेतलंस. रितसर प्रशिक्षण घेऊन तू आद्यशिक्षिका, मुख्याध्यापिका बनलीस. आदिम काळापासून स्त्री हा शोषित वर्ग, तिच्या उद्धाराचे अवघड काम तू जीवाच्या आकांताने पार पाडलेस. पारंपरिक, सनातनी आणि म्हणूनच मूर्छीतावस्थेमध्ये जगत असलेल्या स्त्री जातीमध्ये तू प्राण फुंकलास. 

एका माथेफिरू टोळभैरव धटिंगणाने तुला धमकी दिली की तू हे महिलांना शिकवण्याचे पाप करू नको, नाहीतर मी तुझी अब्रू लुटेन. त्यावेळी तुझ्यातल्या रणरागिणीने त्याच्या कानफटात मारली. शंभर पुरुषांचे धाडस तुझ्या ठायी होतं. तुझा मनोनिर्धार पक्का होता. क्रांतीसूर्य जोतीबांची खंबीर साथ, सगुणाआऊंचं मार्गदर्शन, फातीमाजींची वाऱ्यावादळातली अनमोल सोबत तुला लाभली. तू एका आयुष्यात अलौकिक कामांचा डोंगर उभा केलास.

शाळेत जाताना रस्त्यात तुझ्यावर शेण - सडकी अंडी फेकली गेली. तुझ्याकडे आणखीची एक साडी असायची. तुला कळलं होतं की निकोप आणि सुसंस्कृत समाज निर्मितीसाठी घरातली स्त्री शिकली पाहिजे. अलीकडे आपण सरकारी एसटी बसवर वाचतो की मुलगी शिकली प्रगती झाली. ह्याची बीजे तू पेरली होतीस. बऱ्यापैकी स्त्रिया शिक्षित झाल्या आहेत. पण त्या तुला विसरू लागल्यात. वास्तविक पाहता तुझ्या वाटेवरून चालणाऱ्यांनी जागल्याच्या भूमिकेतून इतर अडल्या नडलेल्यांना सजग करायला हवे. उपासतापास कर्मकांडात अडकलेल्यांना तू दाखवलेल्या मार्गावरून चालावे लागेल. त्या काळात एका विधवेचा अनौरस मुलगा तू दत्तक घेतलास. अत्याचाराला बळी पडलेल्या काशीबाईसारख्या शेकडो स्त्रियांना तू जीवनदान दिलंस. आमच्या येथे बाळंतपणे केली जातील अशी पाटी लावून तू तुझ्या राहत्या घरालाच सुतिकागृह बनवलंस. विधवा पुनर्विवाह, बालहत्या प्रतिबंधकगृह उभारलीस, जरठ विवाह रोखलेस, जोतिबांच्या सत्यशोधक समाजाची धुरा तू अखेरपर्यंत वाहीलीस आणि ते ही दीडशे वर्षापूर्वी, सनातनी पुण्यात.

आजही आपल्या देशात मुलगा हवाच या हट्टापायी गर्भचिकित्सा (गुपचूप) करून स्त्रीभ्रूण हत्या होत आहेत. लाज वाटते ते पुरोगामित्व मिरवण्याची. वेळ आली आहे तुझा वारसा समर्थपणे पुढे चालवण्याची, आडवे येणाऱ्यांच्या कानफटात मारण्याची. पण त्यासाठी समस्त महिलांनी आपल्यातलं स्त्रीत्व-सत्व-तत्व समजून घेणं आवश्यक आहे. मंदिरप्रवेश जर तुमचं माणूसपण नाकारत असेल तर तुम्हांला समस्त देवदेवतांवर सामुहिक बहिष्कार घालावा लागेल. स्त्री स्वतःच निर्मिक आहे याचं भान समस्त स्त्रियांना असणं आवश्यक आहे. खरं तर स्त्रीत्वाचा सन्मान हे पुरुषार्थाचं पहिलं वहिलं लक्षण आहे हे साऱ्या पुरुष जातीने समजून घेणं अत्यावश्यक आहे. 

सावित्रीमाई तू खरीखुरी सरस्वती आहेस आणि तुझ्या प्रयत्नाने आजची स्त्री शिकली, कमावती झाली, माणसात आली. मात्र आजही ती पुरुषप्रधान पुरातन आणि सनातन संस्कृती, रूढी, परंपरा, अज्ञान अशा दुष्टचक्रात गुरफटून गेली आहे. ह्याला अपवाद गरीब/श्रीमंत, साक्षर/निरक्षर असाही नाही. श्रीमंतीत तर महिला एखाद्या wall piece सारख्या अलंकारांनी सदैव आभूषित असतात. शिकलेल्या महिलाही कर्मकांड आणि तीर्थाटनात धन्यता मानताना दिसतात. नवरात्रौत्सवात देवीचा जागर करण्यासाठी नऊ दिवस नऊ रंगांनी न्हाऊन आपण कोणत्या मार्केटिंगला बळी पडत आहोत, याचे भान स्त्री वर्गाला असले पाहिजे. सरकारी कार्यालयांतील भितींवर महात्मा गांधी, महात्मा जोतीबा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. आंबेडकर यांच्यासमवेत स्वतःच्या अलौकिक कर्तुत्वाने तु ही विराजमान झालीस. दु:खं याचं आहे की, तुझ्या प्रयत्नातून शिकल्या सवरलेल्या कमावत्या स्त्रिया टेबलाच्या काचेखाली कुठल्यातरी बाबा, बुवा किंवा एखाद्या मातेचा फोटो लावतात, मंगळागौर आणि मार्गशीर्षच्या गुरुवारच्या पुजेची चर्चा करत बसतात. हे बघून आणि ऐकून काय वेदना होत असतील तुझ्या जीवाला ! 
  
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या अनुयायांना म्हणाले होते, मी हा परिवर्तनाचा गाडा इथपर्यंत आणून ठेवलाय, तो पुढे नेता आला नाही तरी चालेल, पण मागे मात्र नेऊ नका. ह्या उक्तीनुसार दीडशे वर्षापूर्वी सावित्रीमाईनं जो क्रांतिमार्ग आपल्याला दाखवला त्यावरूनच आपली वाटचाल व्हायला हवी. हीच खरी त्या माऊलीला आदरांजली ठरेल.   

आपल्या शिक्षण प्रक्रियेत वैज्ञानिक दृष्टीकोन आणि नागरी जीवनातील संविधानिक तरतुदी अंगी बाणविणे ही काळाची गरज आहे. ज्ञानज्योती-क्रांतीज्योती प्रतिभाशाली कवयित्री होत्या. 
त्या म्हणतात, 
‘शुद्र आणि अतिशूद्र 
अज्ञानाने पछाडले.'
'देव धर्म रूढी अर्ची 
दारिद्र्याने गळाठले.'

वयाच्या २३ व्या वर्षी काव्यफुले आणि उत्तर आयुष्यात सलग ५० वर्षे समाजसेवेला अखंड वाहून घेतल्यानंतर १८९२ साली त्यांचा दुसरा काव्यसंग्रह बावनकशी सुबोध रत्नाकर त्यांनी आपल्याला दिला. उद्वेगाने त्या लिहितात,
दुसऱ्यास मदत नाही,
सेवा, त्याग, दया, माया ही,
जयापाशी सद्गुण नाही,
गुलामगिरीचे दु:ख नाही,
जराही त्यास जाणवत नाही
माणुसकीही समजत नाही
तयास मानव म्हणावे का?

माणूस, अधिक चांगला समृद्ध माणूस घडवण्यासाठी ह्या माऊलीनंं आपलं अवघं आयुष्य वेचलं. ह्या महाराष्ट्राचा आणि देशाचाही सामाजिक, शैक्षणिक लेखाजोखा फुले दांपत्याशिवाय पूर्ण होऊ शकणार नाही. सर्व समस्यांवर विशेषकरून सांप्रत स्त्रीच्या दुर्दशेवर मात करण्यासाठी शिक्षण हाच मूलमंत्र तू आम्हाला आपल्या कृतीद्वारे सांगितला आहे.  

शिक्षणावर भाष्य करणारी तू तत्ववेत्ती होतीस. त्यावरील तुझे मूलगामी विचार आजही महत्वाचे आहेत. आईच्या योगाने मुलांची सुधारणा म्हणून स्त्री शिक्षिका आणि स्त्री शिक्षण. समस्त शिक्षक बिरादरीने आपल्या विद्यार्थ्यांची आई बनायला हवे. शिक्षण घरोघरी नव्हे दारोदारी पोहोचण्यासाठी बहुजनांच्या मुलांना बहुजन शिक्षक असावेत. गरिबी आणि गरीबांविषयी त्यांच्या ठायी कणव असेल. शूद्रांचे दुखणे या कवितेत त्या म्हणतात, 
शूद्रांना सांगण्याजोगा आहे 
शिक्षण मार्ग हा 
शिक्षणाने मनुष्याचे 
पशुत्व हाटते पाहा 

ह्या फुले दांपत्याला समाजाने तर वाळीत टाकलेच होते, आईवडिलांनीही त्यांना सोडले, राहते घर सोडावे लागले. पण ह्या सर्वस्वाची होळी करून त्यांनी हाती घेतलेले कार्य अर्धवट सोडले नाही. रस्त्यावर आलेल्या फुले उभयतांना त्यांच्या उस्मान शेख ह्या जिवलग मित्राने गंजपेठेत आपल्या राहत्या घरात जागा दिली. त्यांच्या भगिनी फातीमाजी आणि सावित्रीमाई तुम्ही दोघी स्त्री शिक्षणाच्या उद्गात्या ठरल्या.

सावित्रीमाई तू एक वीरपत्नी होतीस, सत्यवती होतीस, तत्ववेत्ती होतीस, कवयित्री होतीस. शब्दांच्या पलीकडची तू आमची माऊली आहेस. तुझ्या अलौकीकतेला सलाम करण्यासाठी हा पत्रप्रपंच.

- मारुती शेरकर 

1 comment:

Sunil Dharma Burkul (BMC) said...

सर, लेखातील प्रत्येक शब्द खुप गहन अर्थ बोलतोय, असे वाटते.