Friday, 11 November 2016

आलो उजळावया वाटा..

आलो उजळावया वाटा..
लेखाचे शीर्षक अर्थात तुकोबांकडून..

पिढ्यानपिढ्या अंधारलेल्या गुहेत शिक्षणाच्या रूपाने आलेला एक कवडसा अवघा अंधार गिळून टाकणार आहे. ज्ञानाचा हा उत्सव आहे. आपल्याला या प्रकाशरूपी ज्ञानाची आराधना करायची आहे. पृथ्वीतलावर आजपर्यंत झालेले सर्व बदल, क्रांती आणि परिवर्तन केवळ शिक्षणाद्वारेच शक्य झाले आहे. हे शिक्षण घराघरातल्या प्रत्येक दारापर्यंत पोहोचले पाहिजे. यशवंत मनोहर म्हणतात, ज्ञानासाठी भुकेलेल्यांना उजेडाचे तुकडे खाऊ घाला. महात्मा फुले म्हणतात, अज्ञानाच्या दुष्ट चक्राला भेदणारी ही शिक्षण प्रक्रिया सर्व पराक्रमांचे मूळ आहे. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शुद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. १८८२ साली महात्मा फुल्यांनी हंटर कमिशनसमोर सार्वत्रिक आणि मोफत शिक्षणाचा हट्ट धरला होता. तब्बल दीडशे वर्षानंतर अलीकडे केंद्र आणि राज्य सरकारांनी शिक्षण हक्क कायदा अंमलात आणला आहे. त्याची अंमलबजावणी यशस्वीरीत्या व्हायला हवी. कुणी नापास नाही मात्र आठवी-नववीच्या काही विद्यार्थ्यांना वाचन-लेखन येत नसावे ही शोकांतिका आहे. हे विद्यार्थी गतिमंद अथवा मतीमंद नाहीत. तरीही ही दुरवस्था आहे.

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन (CCE – Continuous Comprehensive Evaluation)   
उपचारात्मक शिक्षण पद्धती (Remedial Education)
पायाभूत चाचण्या (Baseline Tests)
ज्ञानसंरचनावाद (Constructivism)

ह्या संकल्पना म्हणाव्या तेवढ्या स्पष्टपणे आणि सद्हेतूने राबविल्या न गेल्याने सर्वाना पास करता-करता व्यवस्थाच नापास झाली की काय? असा विचार मनात डोकावतो.

या अनुषंगाने आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकरांची दोन विधाने लक्षात घेण्यासारखी आहेत, (१) Right to education पेक्षा right education ची गरज आहे. आणि (२) दर्जेदार शिक्षकांचा अभाव ही राष्ट्रीय आपत्ती समजावी. सम्राट चंद्रगुप्ताला आर्य चाणक्यने म्हटले होते, ‘हे राजन, शिक्षक कभी साधारण नही होते, प्रलय और निर्माण उनकी गोदमें पलते है. उन्हे अगर निर्माण के लिए अवसर नही मिला तो प्रलय निश्चित है.’

शिक्षणावर बोलत असताना विद्यार्थी आणि शिक्षक ह्या दोहोंचाही साकल्याने विचार अनिवार्य आहे. विशेषतः गरीब आणि झोपड्यांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये Tremendous Energy and potential असूनही प्रकर्षाने जाणवणाऱ्या काही व्याधी नजरेआड करता येणार नाही. (१) Attention Deficiency (Body is here and mind somewhere) (२) Poverty of expectation विजीगुषी वृत्तीने अधिकाधिक गुण मिळवून प्रगती साधावी अशी इच्छा नसण ही तशी घातक बाब आहे. गरीब असण वेगळ आणि गरीब राहण वेगळ. ह्यासाठी शिक्षकांची भूमिका अतिशय परिणामकारक ठरते. शिक्षक विद्यार्थ्यांसमोर Model (आदर्श) आणि Catalyst (उत्प्रेरक) य भूमिकेत असायला हवा. शिक्षण महत्वाचे पण त्याहीपेक्षा प्रशिक्षण अधिक महत्वाचे आहे. मार्गदर्शन महत्वाचे पण त्याहीपेक्षा मार्गक्रमण अधिक महत्वाचे असते. समोरील विद्यार्थी नव्या युगाचे, नव्या दमाचे शिलेदार आहेत. त्यांच्याकडून शिकण्यासारखे खूप काही असते. शिक्षकांनी असा गोड गैरसमज करून घेऊ नये की मी शिकविल्याने माझे विद्यार्थी शिकतात. Someone teaches and someone learns ही outdated concept आहे. शिक्षकांनी उपदेशात्मक प्रवचन करू नये. मुलांना घरी-दारी ह्या dos and don’ts चा उबग आलेला असतो. मुलांनी ‘शिकायचे का आणि कसे’ हे शिक्षकांनी मुलांच्या गळी उतरवले पाहिजे. आपण विद्यार्थ्यांच्या मनात कुतूहल, प्रश्न निर्माण केले पाहिजेत. नवीन ज्ञान मिळवण्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. सर्वेक्षण करायला लावले पाहिजे. निरीक्षण करायला सांगितले पाहिजे. नवनवीन प्रयोग, अभिनव उपक्रमांसाठी प्रेरणा दिली पाहिजे. एखाद्या घटनेवर भाष्य करायला सांगितले पाहिजे. वेगवेगळ्या क्षेत्रभेटी आयोजित केल्या पाहिजेत. त्यांच्यातील सर्जनशीलतेला वाव दिला पाहिजे. नामवंताच्या मुलाखती घ्यायला सांगितल्या पाहिजेत. LCD-Projector-Net च्या सहाय्याने Audio – Visual Programmes केले पाहिजेत.

I am going to teach नव्हे तर we are going to learn. दिवसाची / तासिकेची सुरुवात Good Morning / Afternoon ने नव्हे तर Problem Sir / Madam ने व्हायला हवी. स्वभ्यास करणाऱ्याला अनंत Problems भेडसावतात. याउलट अलीकडे, If teacher asks – Any problem? तर Mass Answer असते No Problem. हा No Problem खरा Main Problem असतो. विद्यार्थ्यांमध्ये प्रश्न निर्माण करणे, त्याला वादविवाद करण्यास भाग पाडणे, ह्या युक्तिवादातून त्याचा अभ्यास होईल. त्याच्या समस्या निवारणासाठी यथाशक्ती आणि विद्यार्थीसापेक्ष उपाययोजना करायला हव्यात. After all learning is absolutely a learner’s job. शिक्षक त्या विद्यार्थ्यास शिकायची प्रेरणा देऊन त्याला शिकायला मदत करत असतो. म्हणून तो a friend, a felicitator, A guide, A mentor, A model, an ideal personality etc. या भूमिकेत असावा. Teacher is not like a fuel pipe, but he is a spark plug to ignite. तो एक चीनगारीच्या रुपात असतो. तो केवळ माहितीचा साठा असून चालणार नाही. पाणी साठ्विणाऱ्या टाक्यांप्रमाणे नव्हे तर शिक्षक अखंड वाहणाऱ्या जिवंत निर्मळ झाऱ्याप्रमाणे असावेत. The best teacher will not give you something to drink, he will make you more thirsty, he will put you on a path to seek answers. ज्ञानसंरचनावाद हे अध्ययन अध्यापनातलं तत्वज्ञान आहे. आपले पूर्वानुभव, कौटुंबिक पार्श्वभूमी, आर्थिक स्थिती, संस्कृती, बोली भाषा, Heredity & circumstances महत्वाची भूमिका बजावतात.

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना मुलाखतकाराने एकदा विचारले, तुम्ही सर्व भावंड गायक कसे झालात? त्यांनी दिलेलं उत्तर समर्पक आहे. त्या म्हणतात, तू जरी आमच्या मंगेशकर कुटुंबामध्ये जन्माला आला असतास तर तुही एक गायक झाला असता. रोज नवीन काही शिकण्याची प्रबळ इच्छा विद्यार्थी आणि शिक्षक या दोघांमध्ये असायला हवी. Coming together and having discussion is very important. Discussion is an exchange of knowledge. Two heads are better than one. ह्या नवनवीन संकल्पना रुजल्या पाहिजेत. विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष सहभाग अतिशय महत्वाचा आहे. Active participation is better than passive reception. कारण If I hear – I forget, If I see – I remember but If I do - I know हा विचार महत्वाचा आहे.

संयुक्त राष्ट्र संघटनेच्या युनेस्कोने शिक्षणाविषयी चार बाबी सांगितलेल्या आहेत.
१) जाणून घेण्यासाठी शिक्षण Learning to know
२) कृतीशील शिक्षण Learning to do
३) सहजीवन-सहिष्णुता Learning to live together
४) ‘स्व’साठी शिक्षण Learning to be 

विद्यार्थी सुजाण नागरिक बनायला हवा. केवळ शिक्षण हक्क आणि शिक्षण प्रसार नको तर शिक्षणाची गुणवत्ता उंचावली पाहिजे. केवळ परीक्षेतले गुण नको तर सद्गुणांची जोपासना व्हायला हवी. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजणे आवश्यक आहे. Minu Masani म्हणतात, India is a rich country with poor people. भारत हा गरीब लोकवस्ती असलेला श्रीमंत देश आहे. हे बदलवण्यासाठी काही अमुलाग्र बदल करावे लागतील. ह्या देशात हजारो शाळा, लाखो शिक्षक आणि करोडो विद्यार्थी आहेत. १९५३ साली पंडित नेहरू यांनी संसदेत विज्ञानविषयक धोरण मांडले. त्यात त्यांनी म्हटले, The scientific temperament is a process of thinking, a method of action, the search of truth, a way of life and the spirit of a free man. हे आत्मभानाचं स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य महत्वाचं आहे. मानो, नाही तर ‘जानो’ ह्या तत्वाचा परिपोष आवश्यक आहे. नोबेल पारितोषिक विजेत्या शास्त्रज्ञा मादाम क्युरी म्हणतात, Nothing in life is to be feared, it is only to be understood. Now is the time to understand more, so that we may fear less. ह्या बाबी केवळ कागदावरच राहिल्याने आजची परिस्थिती आपण ओढवून घेतलेली आहे.

कधी काळी Bertrand Russell यांनी म्हटले होते, Men are born ignorant and they are made stupid by education. किंवा George Bernard Shaw यांनी म्हटले होते, (1) I never let my school to interfere in my education. (2) Education through text book is meaningless if it doesn’t make a good human being. ह्या विचारवंताची विधाने शिक्षक बंधुभगिनिंनो आपल्याला खोडून काढायची आहेत. केवळ अभ्यासक्रमाचे दळण दळत न बसता विद्यार्थ्यांमध्ये सुसंस्काराचे वळण रुजवायचे आहे. नवसमाज घडविण्यासाठी आपल्याला कात टाकावी लागेल. भारतरत्न आचार्य विनोबा भावे म्हणत, (१) लहानांना महान बनवते व महानांना लहान बनवते ते खरखुर शिक्षण आहे. (२) शिक्षक विद्यार्थीप्रिय असावा, विद्यार्थी ज्ञानप्रिय असावा, ज्ञान सेवाप्रिय असावे आणि उपरोक्त चारही घटक समाजप्रिय असावेत. त्यातूनच नवसमाजाची निर्मिती होऊ शकेल. कर्मवीर अण्णांनी अवघा महाराष्ट्र साक्षर केला. क्रांतीज्योती सावित्रीने शेण, अंडी अंगावर झेलली. लोकशिक्षक गाडगेबाबांच्या हातातला खराटा केवळ स्वच्छतेचं प्रतीक नसून त्याद्वारे अंधश्रद्धेचं त्यांनी निर्मुलन केलं. महाराष्ट्र माऊली साने गुरुजी आपल्यासमोर अढळ तारा बनून आहेत. संतांच्या आणि महापुरुषांच्या विचारांचा वारसा यथाशक्ती आपल्याला पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायचा आहे. नियती म्हणा वा जगनियंत्याने आपल्यावर फार जोखमीची जबाबदारी सोपवलेली आहे.

सांगता करण्यापूर्वी दोनच उदाहरणे आपल्यासाठी देतो. माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे प्राथमिक शिक्षक इयादुराई यांनी वर्गातील मुलांना एके संध्याकाळी रामेश्वरमच्या समुद्रकिनारी छोटा सालोमन पक्षी आकाशात उंचच उंच कसा उडतो ह्याचे प्रात्यक्षिक दाखविल्याने आपल्याला अब्दुल कलामांच्या रूपाने Missile Man मिळाले. युनियन हायस्कूलमध्ये शिक्षण घेतलेल्या डॉ. माशेलकरांच्या भावे सरांनी आपल्या तुटपुंज्या पगारातून विद्यार्थ्यांचे तिकीट काढून त्यांना अंबरनाथ येथील काडेपेटी बनविणाऱ्या व्हीमको factory ची सैर घडवून आणली होती.

विद्यार्थ्यांमध्ये सुप्त व्यक्तिमत्वे दडलेली आहेतच. त्यांच्या या आत्मशोधाच्या प्रवासात आपण सुज्ञ शिक्षकांनी ह्या चाचपडणाऱ्या आणि सैरभैर विद्यार्थ्यांना योग्य दिग्दर्शन करण्यासाठी त्यांचे गाईड बनणे आवश्यक आहे. प्रसिद्ध शिल्पकार मायकल एन्जेलोला त्याच्या मित्राने विचारले, या ओबडधोबड दगडांतून तू इतकी सुंदर शिल्पं कशीकाय बनवू शकतोस? अतिशय मार्मिक उत्तर- प्रत्येक दगडात शिल्प असतेच, मी फक्त नको असलेला भाग काढून टाकतो, उरते ते सुंदर शिल्प. उपरोक्त वेगवेगळ्या भूमिकेतून विद्यार्थ्यांना घडवणे आवश्यक आहे.

सुरेश भटांच्या या पंक्तीने मी माझे मनोगत थांबवतो,
“जरी या वर्तमानाला कळेना आमची भाषा,
विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही.”
- मारुती शेरकर
दि. ११ नोव्हेंबर २०१६.

3 comments:

Sachin said...

Very nice

Balkrishna Shinde said...

अतिशय प्रभावी शब्दांत सद्यस्थिती रेखाटली आहे.प्रत्येकाला आत्मभान दिलं आहे.उपाय सुचवले आहेत.आपण स्वतः एक आदर्श शिक्षक असल्यामुळे नेमके कुठे दुखते आणि त्यावर उपाय काय याची सखोल जाण स्वानुभावातूनच आलेली असल्याचे जाणवते किंबहुना त्यामुळेच आपल्या शब्दांना धार आहे.मार्मिक आणि प्रत्ययकारी उदाहरणांमूळे संपूर्ण लेख प्रत्येकाला अंतर्मुख करतो.'जखम मांडीला अन् मलम शेंडीला' अशा काहीशा संभ्रमात शिक्षण सापडले आहे आणि हे शल्य आपल्याला सतत बोचत रहाते.सर,आपल्या प्रतिभेला माझे कोटी कोटी प्रणाम.

योगेश सुदर्शन मिश्र said...

समीचीन एवं सार्थक चर्चा...
सादर अभिवादन।